किनारा मला पामराला

Maker:0x4c,Date:2018-2-26,Ver:4,Lens:Kan03,Act:Lar01,E-Y

Maker:0x4c,Date:2018-2-26,Ver:4,Lens:Kan03,Act:Lar01,E-Y

परवाच मित्राची आई गेली. वय बरंच, पंच्याऐशीच्या पुढे. ‘सुटल्या बिचाऱ्या’ असंही कुणीतरी वैकुंठात म्हटलेलं कानी पडलं. वैकुंठात एक विचित्र कडवट, आंबूस गोड वास असतो. मी जळणाच्या वखारी समोर एका दगडी भिंतीवर बसलो होतो. एक नऊवारीतल्या वयस्कर बाई, ‘आवं, इथे ‘सावडायचा’ कार्यक्रम कुटं चाललाय?’ म्हणून विचारत आल्या. गर्द उद्यानापलिकडील गर्दी असलेल्या शेडकडे निर्देश करून, ‘तिकडे विचारा’ म्हणून त्यांना वाटेला लावलं. खरखरीत आवाजात ‘मोघे’गुरुजींचे स्पष्ट मंत्रोच्चार ऐकू येत होते. इथलं हिरवंगार उद्यान देखील उदास वाटतं. फोनवर कळलं की नातेवाईक मंडळी पोचायला अजून अर्धा तास तरी लागणार. तिथल्याच चहाच्या स्टॉलवरून एक कागदी कपातला चहा घेतला. नाकातला तो वास आणि जिभेवरील चिकट मिट्ट गोड चव, मला सारंच असह्य झालं होतं. मी पट्कन गाडीत जाऊन बसलो. गाडीच्या काचा बंद करून मी एसी सुरू केला. ड्रायव्हरला म्हणालो, ‘चल, आपण एक चक्कर मारून येऊ!’ मला तिथे थांबणं अशक्य होतं. नदीपाशी पोचल्यावर मी काचा उघडून एक खोल मोकळा श्वास घेतला, तेव्हा कुठे जरा बरं वाटलं. मृत्यूचा तो निकट गंध अस्वस्थ करणारा होता.

IMG_20190921_084248

तसा मी अनेकदा वैकुंठाला आलो आहे. मोठ्या धीरानं अनेकांचं सांत्वन केलं आहे. लहानपणी शाळेत असतांना केवळ कुतूहलापोटी, ‘नी. गो. पंडितराव’ या लाडक्या सरांच्या अंत्ययात्रेबरोबर ठाण्याच्या स्मशानात गेलो होतो. थोड्याच वेळात कुणीतरी वडिलधाऱ्या माणसानी, ‘चला रे पोरांनो, तुम्ही इथे यायचं नसतं!’ असं झापून आम्हाला घरी पिटाळलं होतं. ‘आयुष्याचा शेवट चितेवर होतो’ एवढंच कळण्या इतपत अक्कल होती. एक नक्की की भीती वाटली नव्हती. पुढे गिर्यारोहणात दोन तीनदा जवळच्या सहकाऱ्यांचा मृत्यू पाहण्याची पाळी आली. दुःख होतं, पण तेव्हा त्याची अटळता मी सहजपणे स्वीकारली होती. आता कदाचित वयाचा परिणाम असेल, पण अस्वस्थता होती येवढं मात्र खरं! कधी दुरून तर कधी जवळून आपला आणि मृत्यूचा संबंध येतोच. बहुतेक वेळेस ‘हॅः, माझा काय संबंध?’ अश्या बेफिकीरीने ‘तो’ अप्रिय विषय मी झटकून टाकत असे. त्यादिवशी मात्र माझी अस्वस्थताच मला अस्वस्थ करत होती.

12-a

कदाचित जमा-खर्च मांडायची वेळ आली असावी. दोनच वर्षांपूर्वी खूप जुने मित्र एकत्र भेटले. कित्येक आठवणींना उजाळा मिळाला म्हणून मजा आली. आता मागे वळून पाहतांना, वळणा वळणांचा रस्ता दिसतो. तसं पहिलं तर आजवर चुकत माकत शिकत आलो. आयुष्यात मस्ती खूप केली. लहानपणी आई-वडिलांचा धाक असूनही, त्यांची नजर चुकवून व्रात्यपणा केला. कधी घरून सुटे पैसे ढापून शाळेसमोरच्या भैय्याकडून आईसफ्रूट खाल्लं, तर समोरच्या ‘स्वागत’मधे बसून चोरून बटाटावडा खाल्ला. वडिलांचे ठाण्यात क्लासेस, त्यामुळे त्यांचे विद्यार्थी सर्वदूर पसरलेले. त्यातून आमचे फादर ‘जगमित्र’! कॉलेजला जायला लागल्यानंतर, पुलावरून जाण्याचा कंटाळा म्हणून एका लोकलमधून दुसऱ्या लोकलमध्ये उडी मारून, एक नंबर प्लॅटफॉमला आल्याबद्दल घरी कुणीतरी अर्जंट ‘रिपोर्ट’ दिला होता. मग संध्याकाळी घरी साग्रसंगीत पूजा झाली. एकंदरीत उनाडपणा मनसोक्त केला. आठवीत असतांना वर्गात नंबर घसरत घसरत एकतीसावर पोचला. घरून प्रगतीपुस्तकावर बाबांची सही आणणं भाग होतं. घरी यथासांग ‘कौतुक’ होणार म्हणून मन घट्ट करून बाबांच्या हाती प्रगतीपुस्तक दिलं. काहीच न होता बाबांनी सही केली आणि म्हणाले, ‘बाळकोबा’ आयुष्यात काही बनायचं असेल तर एकतीसातील तीन काढून टाकता आला तर बघा!’ हे सारंच अनपेक्षित होतं आणि म्हणूनच तो प्रसंग मनावर कोरला गेला. पुढील आयुष्यात काहीही करतांना सर्वोत्तमाचा प्रयत्न करायचा यासाठी तो एक महत्त्वाचा धडा होता. अकरावीत पहिला नंबर, आयआयटी प्रवेश परीक्षेत संपूर्ण भारतात एकशे सोळाव्वा क्रमांक अश्या अवघड शिड्या मी लीलया चढत गेलो. सर्वोत्तमाचा ध्यास हे वेड तेव्हा लागलं.

vgl_photo2

A1

रुईया कॉलेजात असतांना, केवळ कुतूहलापोटी पेब किल्ल्यावर (विकटगडावर) हाईकला गेलो आणि डोंगरवाटांनी वेड लावलं. तिथून ‘आयआयटी’त गेल्यावर गिर्यारोहण, हा छंद ते ध्यास असा प्रवास कसा झाला ते कळलंच नाही. आज मागे वळून पाहतांना, ‘इंजिनीयर’ का व्हायचं होतं?’ या प्रश्नाशी मी अडखळतो. खरं सांगायचं तर ती रीत होती, यशस्वी होण्याचा तो एक राजमार्ग होता येवढंच! मेकॅनिकल इंजिनीयरिंग म्हणजे काय हे कळण्याची अक्कल नव्हती, फक्त या ‘ब्रँच’ची चलती आहे हे ठाऊक होतं. होस्टेलमधे समवयस्कांबरोबर राहणं ही चैन होती. तुटपुंजा पॉकेटमनी ही अडचण होती पण कदाचित त्यामुळे बहकलो नाही, भरकटलो नाही. एक अफाट झिंग आणणारं स्वातंत्र्य होतं. एक मस्ती आणि दुर्दम्य आत्मविश्वास होता. अभ्यास यथातथाच पण गिर्यारोहण, नाटक हे छंद मनसोक्त जोपासता आले.

A2

 

IMG-20171125-WA0111

आयआयटीतून बाहेर पडल्यावर, पाचसहा वर्षांचा काळ अस्वस्थ करणारा, उत्साही साहसांचा धमाल काळ होता. वर्षात हिमालयातील दोन मोहिमा करायच्या हे ठरलेलं होतं. वडिलांनी तेविसाव्व्या वर्षी, ‘आता तुम्ही तुमचं पहा’ अशी स्वच्छ ताकीद दिली. मी हे माझं भाग्य समजतो. कारण पुढे देखील अचाट, अफाट स्वप्नं पाहतांना आणि त्यांच्यामागे बेभानपणे धावतांना, माझे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. पाचसहा नोकऱ्या झाल्या. त्याच काळात आम्ही काही ‘डोंगरी’ मंडळी एकत्र आलो आणि शाळकरी लहान मुलांसाठी कान्हेरी, सिंहगड येथे साहस शिबिरं भरवू लागलो. तेव्हा ही संकल्पना नवीन असूनही तुफान प्रतिसाद मिळाला. यातूनच या क्षेत्रातील पुढील शिक्षणासाठी स्कॉटलंडला जाण्याची भन्नाट अशक्यप्राय कल्पना सुचली. १९८२ साल, त्याकाळी लाखभर रुपये खर्च येणार होता. त्याआधी वर्षभर नन्नाचे पाढे ऐकत, ‘फार तर काय नाही म्हणतील!’ हा महत्त्वाचा धडा शिकून, चिकाटी न सोडता मी आउटडोअर एज्युकेशन मधील एक वर्षाचा डिप्लोमा करण्यासाठी एडिंबरो येथे दाखल झालो. डिप्लोमा, मग डोंगराएव्हढं कर्ज फेडण्यासाठी सौदी अरेबियातील नोकरी. त्यानंतर खिशात चार पैशे खुळखुळवत, अंगठा दाखवत ‘हिचहायकिंग’ करत केलेली दोन महिन्याची युरोप सफर. ‘पुढे काय?’, भविष्य हे सारेच विचार तेव्हा दूरस्थ होते. समोर येईल तो अडचणीचा डोंगर आपला, मग कमावलेली कल्पकता आणि सर्व शक्तीनिशी त्याला भिडणं हेच सुचत असे. तो साराच रगेल, कलंदर प्रवास स्वप्नवत होता. मी खूप समृध्द होऊन परत आलो.

05

img_20200528_115627

कोकणकडा, गिर्यारोहण मोहिमा, लहान मुलांसाठी ‘रानफूल’ या माध्यमातून आयोजित होणारी परिसर्ग शिबिरे, यासोबतच ब्रिटीश मित्रांबरोबर ‘हाय प्लेसेस’ या कंपनीत सहभाग अशी सारी धमाल सुरु होती. छायाचित्रणाच्या छंदातून सादर केलेली, ‘तो क्षण, ती जागा आणि मी’ अशी तीन प्रदर्शने झाली.  ‘उद्या कधी उजाडणारच नाही’ अश्या धुंदीत अनेक साहसांना सामोरा जात होतो. पोटापाण्यासाठी पैसे लागतात हे भान होतं आणि स्वार्थ सांभाळण्याची आळशी अक्कलहुशारी होती. भविष्यासाठी बेगमी किंवा हात राखून खर्च करणं कधी जमलंच नाही. तसं काय, काहीही हात राखून करणं हा स्वभावच नव्हता! याच प्रवासात मृणालची सोबत मिळाली आणि अनेक समविचारी साहसी वेडे जिवलग मित्र जमा झाले. ‘आउटडोअर मॅनेजमेंट डेव्हेलपमेंट’ म्हणजेच साहसी उपक्रमांचा एक वाहन म्हणून वापर करून, संघभावना आणि नेतृत्वगुणांच्या विकासासाठी प्रशिक्षण. याचा थोडा अनुभव ब्रिटनमधे गाठीशी बांधता आला होता. १९८९ साली तेच प्रशिक्षण कॉर्पोरेट क्षेत्रासाठी भारतात सुरु करून, एका नवीन क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली. काम अव्हानात्मक होतं, पण समाधान आणि आर्थिक स्थैर्य लाभलं. अफाट कष्ट आणि धाडसी निर्णय, यामुळे राजमाची ते गरुडमाची असा गेल्या तीस वर्षांचा रोलरकोस्टर प्रवास झाला आणि यात नशीबाने मृणालसारखी सहधर्मचारिणी मिळाली! रेवतीसारखी गुणी नक्षत्रासारखी मुलगी, नेटका प्रपंच आणि मृणालची सोबत, फारसा विचार न करता मी चक्क गृहस्थाश्रमी झालो होतो! एक गतिमान संतुलन, स्थैर्य सापडलं होतं. अशातच ‘लेखन हा आपला प्रांत नाही’, अशी पंधरा वर्षांपूर्वी सुरवात करून, काही कथा आणि ‘लॉक ग्रिफिन’ आणि ‘विश्वस्त’ अश्या अफाट यशस्वी कादंबऱ्या असा बेफाट लेखन प्रवास मजेत झाला. शांत सागरावर, लपलपणाऱ्या लाटा कापत वेगात निघालेल्या डौलदार जहाजावरील सफरीचा तो अनुभव होता. पायाखाली दमदार, धडधडणाऱ्या इंजिनाची आश्वासक थरथर होती. गालावर जाणवणारा यशस्वीतेचा भर्राट वारा आणि अफाट विस्तीर्ण क्षितिजावर पैलतीराचा मागमूसही नव्हता!

 

 

दहा बारा वर्षांपूर्वीची गोष्ट. पहाटे मोटरसायकलवर गरुडमाचीला जातांना मी धडपडलो! डोक्याला खोक आणि कॉलरबोन तुटलेलं. लगेच उपचार झाले. मी एका प्रोग्रॅमसाठी मास्तर म्हणून चाललो होतो. आसपास जीवाभावाचे सहकारी होते आणि मृणालनी लगेच माझा प्रोग्रॅम करण्याची जबाबदारी स्वीकारली. तातडीने विश्रांतीसाठी मला गाडीत घालून पुण्याला पाठवून देण्याची प्रेमळ जबरदस्ती झाली. म्हटलं तर किरकोळ प्रसंग पण माझ्या उधळलेल्या वारूला अचानक नकळत ब्रेक लागला होता. रेवतीनं तातडीनं दुसऱ्या दिवशी मोटरसायकल विकून टाकायला लावली हे अलाहिदा! त्या काळातील अनेक छोटे छोटे प्रसंग आठवतात. क्लायंबिंग वॉलवर लवचिक तरुण मंडळी लीलया बागडतांना पाहणे, साध्या ट्रेकवर ‘झेपेल का?’ म्हणून टेन्शन येणे, सुटलेले पोट दडविण्यासाठी झब्बे आवडू लागणे, नव्यानं सापडलेला मधुमेह वाकुल्या दाखवणे, ‘काका, अंकल’ ही संबोधने राग न येता सवयीची होणे – असं काय काय तरी! शिस्त, व्यायाम वगैरे यांच्याशी फारसं वैर नसलं तरी संबंध जुजबी. एक नक्की की शरीर नावाच्या यंत्राची हेळसांड केली नसली, तरी काळजी घेतलेली नाही हे खरं. ‘पाहू काय होईल ते!’ अशी अव्यक्त मिजास. काय झेपणार नाही याची जाणीव असल्यानं, आचरटपणा टाळण्याचं शहाणपण गेल्या काही वर्षात उन्मेखून राखलं. किनाऱ्यावरील धुक्यात दडलेला पैलतीर नक्कीच जाणवू लागला होता. भीती नाही वाटत, पण मर्यादेचं भान जाणवतं आहे.

054

मला माणसं आवडतात. माझी लोकांशी मैत्रीही सहज होते. माझं कुणाशीही जमतं आणि माझ्यातील कुतूहल मला स्वस्थ बसू देत नाही. मान्यवर, सेलेब्रिटी मंडळी मला जास्त आवडतात असे टोमणे काहीवेळा ऐकू येतात. मला ते आकर्षण आहे, पण त्यात माझा स्वार्थ आहे. एखादा मान्यवर, सेलेब्रिटी असेल तर साहजिकच तो कुठल्या तरी क्षेत्रात पारंगत असतो, त्याचा व्यासंग असतो आणि यामुळे त्या ओळखीतून मला नक्कीच काहीतरी मिळतं. अशी मंडळी माझ्या जवळ का येतात हे मला न उलगडलेलं कोडं आहे. आणि निश्चितच हा फालतू विनय नाही! माझा मनुष्यसंग्रह अफाट आहे आणि मलाही त्याचं आश्चर्य वाटेल असा आहे. गेल्या कित्येक वर्षातील माझी ती कमाई आहे किंवा वैभव आहे आणि म्हणूनच मी स्वतःला भाग्यवान समजतो!

परवाच एका मित्राच्या टीव्ही सिरीयलचं चित्रीकरण चालू होतं म्हणून वाठारला गेलो होतो. ‘विंचुर्णी’ जवळच आहे, पण सहजच ‘मनोहरकाका’ (अॅडमिरल आवटी) आता नाहीत हा सल मनात उमटला. बाजीराव रोडवरून जातांना डावीकडे श्री. म. माटे पथ लागतो. ‘काय बाळोबा?’ असं विचारत, लुकलुकणारे मधुमामा माट्यांचे मिश्कील घारे डोळे आता नाहीत. करंगळी आणि अनामिकेत धरलेल्या सिगरेटचा खोल झुरका घेऊन, ‘काय कॅप्टन लिमये, नाशकात कधी आलात?’ असं मृदू स्वरात विचारणारे तात्यासाहेब (वि. वा. शिरवाडकर) नाहीत. तर्जनी आणि अंगठा, ट्रंप थाटात दाखवत, ‘वेळ थोडा आहे!’ असं म्हणत एन्ट्री घेणारे दाजीकाका लागू, खर्जातल्या घोगऱ्या आवाजात ‘बाळ्या, काय धमाल आहे!’ म्हणणारा अशोक जैन आठवतो. काळाच्या पडद्याआड गेलेले हे सारेच चटका लावून जातात.

 

माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. आहे ते याच जन्मात, ही खूणगाठ घट्ट आहे. मृत्यूचं भय नाही पण तो येणार, हे न कुरकुरता स्वीकारलेलं सत्य! अचानक आला तर काय, या चिंतेनं कपाळावर सदैव ठाण मांडून बसलेल्या आठ्या नाहीत. अजूनही खूप काही करायचं आहे, हा उत्साह आहे. पण सगळं जमलंच पाहिजे हा अट्टाहास नाही. बकेट लिस्टमधे आहे, म्हणून भोज्ज्याला शिवून येणं मान्य नाही. मी अत्यंत आवडीनं ‘गोड’ खाणारा होतो. लहानपणी स्विमिंग पूलमध्ये साखरेचा पाक असावा अशी स्वप्नं पडत. मधुमेह असल्याचा शोध लागल्यावर सुरुवातीस अनिच्छेनं, पण पथ्य पाळायला सुरुवात केली. आता ते सवयीचं झालं आहे. इथून पुढे अशी पथ्यांची बंधनं स्वीकारावी लागणार हे मान्य आहे. पण आयुष्यातील इतर अनेक आनंदांचा गोडवा चाखायची आसक्ती कायम आहे. कलंदर भटकंती आणि साहस हे मला नेहमीच प्रिय होतं. उपदेशाची दांभिकता नाही, पण लेखन हा माझ्यासाठी शोधप्रवास आहे आणि तो आनंद उदंड आहे. काय जमेल याची चिंता न करता, जे जमतंय ते करण्यात वेगळीच मजा आहे. कधीतरी शेवट आहे याचं भान आहे.

Maker:0x4c,Date:2018-2-12,Ver:4,Lens:Kan03,Act:Lar01,E-Y

Maker:0x4c,Date:2018-2-12,Ver:4,Lens:Kan03,Act:Lar01,E-Y

 

The summit is what drives us, but the climb itself is what matters. – Conrad Anker, एक मान्यवर गिर्यारोहक.

शिखरं असंख्य आहेत आणि प्रवास सुरूच राहणार आहे…

IMG-20191014-WA0050

 

  • वसंत वसंत लिमये

 

 

 

 

 

Standard

14 thoughts on “किनारा मला पामराला

  1. निनाद सुरेश विलणकर says:

    खुप छान… खुपच छान
    तुमच्या बरोबर प्रवास केल्याचा अनुभव झाला.
    हायप्लेसेस बरोबर दोनदा जुडण्याची संधी मिळाली.
    आठवणीत साठवावे असे अनुभव.
    कधीतरी भेट होइल ही आशा .

  2. Aparna Barve says:

    खूप छान आढावा घेतला आहेस.
    तुला allowed नाही असं लिहायला…….😒
    यातून एक गोष्ट लक्षात येते की तू स्वतः तुझ्या तब्येतीची काळजी घ्यावी.
    एखाद्या सामान्य माणसाचं आयुष्य जगण्याचं स्वप्न तू प्रत्यक्षात जगलास.
    खूप खूप कौतुक व शुभेच्छा 🌷

Leave a reply to Vasant Vasant Limaye Cancel reply