
मानवाच्या जन्मापासून त्याला प्रश्न हे पडतच असणार. चांगलं काय, वाईट काय? करू की नको? कुठल्याही कृतीच्या मुळाशी हे बायनरी (Binary), दुहेरी प्रश्न असतात. सुरवातीला या प्रश्नांचा नीट उलगडा झाला नसेल, मग अंतःप्रेरणा (Instinct) त्याला मार्गदर्शन करीत असतील. कालांतराने अनुभवातून तो शिकत गेला असणार. आणि या शहाणपणातून संस्कृतीचा जन्म झाला असावा. एका अर्थानं संस्कृती हे स्वतःच्या, पूर्वसुरींच्या अनुभवांचं संचित असतं.
प्राण्यांना, पक्ष्यांना एव्हढंच कशाला साध्या कृमी कीटकांना देखील चांगलं/वाईट, हवं/नको हे छान कळतं. ही एक निसर्गदत्त सहजसुलभ प्रवृत्ती आहे. त्यासाठी फारसा विचारही करावा लागत नाही. खादाड लॅब्रॅडोरला नावडता पदार्थ खायला देऊन पहा! भुकेला असला तरी तो त्याला तोंड लावणार नाही. हे सारं उपजतच असतं. हळूहळू माणसाचा विकास होत गेला, तो शहाणा होत गेला. अग्नीचा शोध लागला, भाषा सापडली, शिकारी जंगली माणूस शेती करू लागला. भीती, अनाकलनीय गोष्टींनी देव जन्माला घातला. माणूस समाजशील प्राणी आहे पण त्यासोबत तो विकारवशही आहे. म्हणूनच आचारसंहितेची गरज भासू लागली. आणि म्हणून काही शहाण्या मंडळींनी धर्म संकल्पिला! धर्म रूढ झाला आणि परंपरा, रितीरीवाज आणि रूढी यांचा जन्म झाला.
विचारांच्या आवर्तनात हरवलो असता मी पुन्हा प्रारंभाकडे वळलो. आदिम सहजसुलभ प्रवृत्तींचा शोध घेऊ लागलो. पूर्वसुरींनी अर्थातच यावर सखोल विचार विमर्श केला असणार! सहजसुलभ प्रवृत्तींच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरकांचा शोध घेतला असणार. यामधे आपल्या संवेदना, इंद्रिये आणि बुध्दी यांचा साकल्याने विचार झाला असणार. आपल्या संवेदनांशी दुहेरी, बायनरी (Binary) निर्णय प्रक्रियेचा जवळचा संबंध आहे. यातूनच रुचीचा, रसांचा शोध लागला! त्या रसांचं वर्गीकरण करता नवरसांची मांडणी झाली असेल. हे रस भावभावनांच्या मुळाशी असतात. नवरसांची व्याख्या पाहता ती संपूर्ण आणि सर्वसमावेशक असल्याचं लक्षात येतं. नवरसांचा अभ्यास करत असता मला भुरळ घातली ती ‘बीभत्स’ रसानी!
शृंगार, हास्य, रौद्र, करूण, बीभत्स, भयानक, वीर, अद्भुत आणि शांत असे हे नवरस. बीभत्स रसात किळस, वीट, तिरस्कार, घृणा ह्या भावना दिसतात. तुम्हाला विचित्र वाटलं असेल की या रसात भुरळ घालण्यासारखं काय आहे! चांगलं काय, वाईट काय या मुलभूत प्रश्नाशी या रसाचा खूप जवळचा संबंध आहे! एका अर्थानं ही अभिरुचीची जननी आहे! इतर कुठल्याही रसाचा अतिरेक या रसाशी जवळीक साधतो. या रसाचा उद्भव रेड सिग्नलसारखा आहे. हाच आपल्याला हीण काय, निकृष्ट काय किंवा धोकादायक काय याची जाणीव करून देतो.
आपल्याकडे नवरस असणं ही निसर्गदत्त देणगी आहे. या सर्व रसांचा विविध कालाविष्कारांशी घनिष्ट संबंध आहे. यामुळे आपली अभिरुची संपन्न आणि समृध्द झाली. यातील ‘बीभत्स’ रस अँटेनासारखा सुकाणू म्हणून आपल्याला मिळाला आहे. काही भीषण परिस्थितीत, उदाहरणार्थ – दुर्गंधीयुक्त गटारं साफ करणारे स्वच्छता कामगार, किंवा हॉस्पिटलमधील मॉर्गमधे, शवागारात काम करणारा कर्मचारी बहुतेक वेळा दारूच्या नशेत असतो कारण त्याला ‘त्या’ परिस्थितीत, मृत्यूच्या सहवासात आपलं शहाणपण शाबूत ठेवायचं असतं! म्हणूनच तो आपला ‘बीभत्स’ रसाचा अॅन्टेना बोथट करून टाकतो! आजकाल नितीमत्ता लयाला गेलेल्या, भ्रष्टाचारानं बरबटलेल्या वातावरणात मनात एक आक्रोश उमटतो, अरे आपला सदसद्विवेक कुठे गेला? ही कीड थोड्याफार फरकानं बहुतेकांना लागल्याचं भयप्रद वास्तव समोर येतं. सारंच विस्मयकारक आहे. आपला अँटेनाच हरवला आहे!
आपण उदासीन झालो आहोत, निगरगट्ट आणि कोडगे झालो आहोत. हे जिवंतपणी मृत असल्याचं लक्षण आहे. खऱ्या अर्थानं जिवंत रहायचं असेल तर तो ‘बीभत्स’ रसाचा अँटेना शोधला पाहिजे. मगच सदसद्विवेक सापडण्याची शक्यता आहे, तरच आपली संपन्न, समृध्द अभिरुची जिवंत राहील! आमेन.
- वसंत वसंत लिमये, १ सप्टेंबर २०२०